शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

‘ती‘ एक ग्रेट भेट

मला आयुष्यात फक्त भरभरूनं प्रेम हवं होतं, संकेत... तेच मिळालं नाही.
क्षणभर स्मित करून , कुठल्याश्या भावगर्दीत ती पुन्हा गढून गेली.  मी मात्र एकटक तिच्याकडे पाहत राहिलो. मनातील दबलेल्या त्या भावना उघड करताना  तिच्या डोळ्यातून आसवं तरळून येत होती.
गोठलेल्या त्या जुन्या जखमां, आज पुन्हा नव्याने पाझरू लागल्या होत्या. त्याचा दाह , त्या मनास  सलत  होता.  त्यास  कारण अन निमित्त मात्र आज मी ठरलो होतो.

एक मित्र म्हणून, मैत्रीतला विश्वास म्हणून , तिचं अनुभव विश्व ,जीवनपट  माझ्यासमोर उलगडलं   जात होतं . ती बोलत होती, नजरेच्या आसवांतून ,  काळजाच्या  दुखिव वेदनेतून अन मी ते सर्व कानी घेत होतो. हळुवार ..

संकेत , हसावं लागतं बघ, जीवनासोबत ह्या  चालायचं झाल्यास..
अगदी म्हणायचं तर लहानपणापासूनच संघर्ष सुरु आहे माझा ह्या  जीवनाशी...
आधी स्वतःच्या शिक्षणासाठी  संघर्ष ,  मग घरातील व्यक्तींच्या आनंदासाठी आणि मग प्रेम .....
ते हि आलं खरं जीवनात , पण सुखानं  नांदलं नाही.

ज्याच्या सोबतीनं  मी आयुष्याची विविध रंगीन स्वप्नं  पहिली. एकत्रित सहवासाने स्वप्नं रंगिवली .
त्यानेच  ऐनवेळी सांगता , विविहबद्ध होतं , माझ्या स्वप्नांची आशाच मावळून दिली.
मला एकाकी करून सोडलं.  खूप रडले होते रे मी तेंव्हा ,  अस्वस्थ,  छिन्न - विच्छिन्न झाले होते.
वेदनांच्या अक्षरशः  ज्वाला फुलल्या होत्या .
त्यात काही वर्ष निघून गेली.

घरच्यांनी  एक स्थळ आणून ,  लग्न लावून दिलं माझं ,   
पण ते हि अवघे दोनच महिने , दोन महिन्याचा काय तो संसार राहिला.  तिथे हि उध्वस्त झाले मी
काय चूक होती म्हणा माझी.  आहे ते सगळं क्लीअर केलं होत ना मी त्याच्याशी ,
पण स्वार्थ नजरेतून त्यानं  माझ्याशी लग्न केलं. अन माझं आयुष्यच उधळून लावलं .
आता  एकाकी मी जगतेयं. हसतेय .

सदा चेहऱयावर हास्य असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात इतके दुखिव वेदनांचे धागेदोरे असतात . हे मी आज प्रत्यक्ष पाहत होतो. तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आज नव्यानेच  कळत होत्या.
ती मोकळी होत होती, हळुवार मनाचा एक एक कोपरा उघड करत....

खूप वाटायचं रे  ‘संकेत , कुणी तरी असावं. ज्यांच्या खांदयावर डोकं ठेवून आपण  भरभरून बोलावं , रडावं , मोकळं होतं हलकं व्हावं. शांत एकाकी पडून राहावं. पण असं कुणी भेटलंच नाही रे... 
असो , हवं ते मिळायलाच हवं असा काही नियम नाही आहे ना? जे आहे त्यातच  आनंद
तसही हसणं शिकलेय मी ,   अन त्याबरोबर  जगणं हि ………..

मी पाहत राहिलो तिच्याकडे, नजरेतल्या कडा ओलावल्या  होत्या.  बोटाने , हळुवारं ते कड,  ती पुसू पाहत  होती . एक स्तब्धता पसरली होती .
वाटलं म्हणावं , मोकळी हो बिनधास्त , मी आहे .  पण त्या शांततेत ते सगळं विरून गेलं.
स्वतःशीच मन पुटपुटू लागलं.

माणसाला आयुष्यात काय हवं असतं बरं? फक्त नि फक्त निस्वार्थ मनानं केलेलं प्रेम.  अन मन मोकळा आधार , संवाद  , बस्स, पण त्यासाठी हि किती झगडावं लागतं,  ह्या आयुष्याची.
म्हणावं तर  , काही गोष्टी  किती सहज येतात आयुष्यात ,   सहजच अगदी , हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा  , तर काही गोष्टी येता येता आयुष्य निघून जातं.

काही क्षण दोघे हि निशब्द होतो आम्ही , काय बोलावे ते कळतं न्हवतं. सुचत न्हवतं.  
तेवढ्यात तिचे बोल कानी आले .

आजच रडून घेते  रे , पुढच्या वेळेस कुणाला वेळ आहे,  हे रडगाणं पुन्हा गायला . एकदाच काय ते मोकळं व्हायचं .हसायचं
दोघांच्याही चेहऱयावर स्मित हास्य उजळलं
अन एक वेगळ्या  विषयाला पुन्हा  सुरवात झाली  .

आई बाबा गावी असतात.  लहान बहीण- भाऊ आहेत.  हि तिथेच आहेत
 सध्या इंजिनीअरिंगच क्षिक्षण घेत आहेत.
मला फार  शिकता आलं नाही.  पण  मला त्यांना  मोठं करायचं आहे. खूप शिकवायचं आहे...
एक भरीव विश्वास तिच्या नजरेतून ओसंडून वाहताना दिसत होता .

मुंबईत इथे मी एकटी आहे. एकटी राहते.  आज जवळजवळ आठ वर्ष झाली.
ह्या मुंबईने , ह्या डिफेन्सस सर्व्हिसने माझ्यात एक बिनधास्तपणा अंगी भिनवला आहे.
अजून खूप सारी स्वप्नं आहेत. माझ्याच ह्या फिल्ड मध्ये मला पुढे जायचंय. जमेल तसं कुणाचा आधार हि व्हायचं आहे. जीवन सार्थ करायचं आहे . बस्स ....
बोलता बोलता ती थांबली. नव्या आत्मतेजाने तिचं मन  प्रसन्नतेत वाहू लागलं होतं.  

भेटीचा म्हणावा तर हा आमचा पहिलाच क्षण आजचा . वर्षभराची जुनी काय ती ओळख.  पण कधी भेटणं झालं नाही. मध्यंतरी तसा भेटीचा योग जुळून आला होता म्हणा ,  पण भेट अशी झालीच नाही .  ती आज घडली (वर्षभराने ) अन ते बरंच झालं म्हणा ,  एक धडाडणारं  खिलाडी व्यक्तिमत्व ..नजरेसमोर आलं.

'ईशान्य वार्ताच्या'  मासिकात छापून आलेल्या माझ्या त्या लेखामुळे तिची अन  माझी काय ती ओळख .
सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन ,लोक कल्याणासाठी , कुणाच आधार होण्यासाठी , सतत धडपडणाऱ्या व्यक्ती मध्ये हि एक , माझ्या मैत्रीच्या लिस्ट मध्ये हिचा  समावेश आहे .हिचा सहवास आहे . ह्याचा मला फार आनंद आहे .  अनं सार्थ अभिमान हि ...,

अगदी वयाच्या साठ सत्तरच्या आसपासच्या हिच्या मित्र मैत्रिणी आहेत . ह्याचा  खरंच खूप कौतुक वाटतं मला  . त्यांच्याशी दिलखुलास बोलणं , त्यांच्यात आपलं म्हणून सहज मिसळून जाणं. त्यांचं होऊन जाणं ,  हिला सहज  जमतं.
नुकतंच एका आजी आजोबांचं . नव्याने लग्न जुळवून दिलं हिने, म्हणे
हे सार अन सगळं कौतूकास्पद आहे
वाचनाची अन कवितेची आवड तर लहानपानापासूनच    ,
पण आता मात्र ह्यासाठी तिला वेळ मिळत नाही

खरंच , वर्षभरात मी तिला इतकं जाणलं न्हवतं.  ते प्रत्यक्ष भेटून आज तिच्याबद्दल एवढं काही जाणता आलं मला
म्हणतात ना , ' माणसं जेवढी 'जवळ' तेंवढी ती अधिकतेने कळतात. नव्याने उलगडली जातात . आतून बाहेरून . तशी ती आज मला  कळली, उमगली आतून बाहेरून.

चेहऱयाशी  हास्य  खिळवून , इतरांचं जगणं अन  जीवन हास्यगंधीत करणाऱ्या एखाद्याचं 'आयुष्य' आतून किती दुखीव वेदनांनी  जखमी असतं. ते हि आज जवळून  पाहिलं.

किती वेदना , किती संघर्ष ,किती त्या ओल्या  जखमा ,  अंगभर झेलुनही ,  फुटणाऱ्या आसवांना आत  दडून ठेवण्याचं , हसण्याचं अन हसवण्याचा सामर्थ्य ह्या लोकांत असतं.
त्यांचे अनुभवी बोल , शब्द नि शब्द म्हणजे प्रेरित जलसागर असतं .  आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी . अन अशी माणसं केवळ योगयोगने भेटतातं.

सलाम तुझ्या कर्तुत्वाला अन जगण्याला......

-  संकेत पाटेकर 
    22.10.2016


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .