बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

....आणि मी प्रेमात पडलो.


....आणि मी प्रेमात पडलो.
सांजवेळ होती.मी माझी दुचाकी घेत रस्त्याच्या एका कडेने सरळ मार्गी जात होतो .
 सूर्य मावळतीला त्याच्या परतीच्या मार्गी जाण्यास अतिशय व्याकूळ झाला होता .
 त्याची चाललेली ती धडपड समोरच नजरेला भिडत, मनाला चैतन्य बहाल करत होती.
 त्याची सोनेरी तांबूस प्रकाश किरणे माझ्या अंगा खांद्यला छेदत रस्त्यावर विखुरलेल्या लाल मातीशी लगट करत होती . त्यातच लहरी वारा हळुवार कानाशी गुंजत मनाशी संगीत खेळी करू पाहत होता .
रस्त्यावर तशी रहदारी न्हवती . तुरळक वाहनांची ये जा आणि एक दोन माणसे अधून मधून दिसत होती तेवढीच .
दुर्तफा झाडी आणि अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतजमीने , आणि त्यावर डोलणारी लुसलुशीत गवतांची पातं . त्या रमणीय वातावरणात , मी माझ्या दुचाकीचा वेग थोडा कमी करत नजरेत ते सारे क्षण टिपून घेण्याच्या प्रयत्नात होतो .
तितक्यात नजरेतील प्रकाशकिरणे थेट एका सुंदर चेहऱ्याकडे खिळून राहिली .नेत्रपटला वरती ती सुंदर आकृती हळू हळू एकजूट होऊ लागली .
गहू वर्णीय गोलाकार चेहरा, काळे भोर सुंदर डोळे ,त्या नजरेतील तिचे आदरयुक्त प्रेमळ भाव .......,
पाहूनच मन वेडावलं .
पाणी भरावयास आलेल्या, विहिरीवरील काठाशी जमलेल्या अनेक मुलीन पैकी ती एक होती . सर्वात उठून दिसणारी . एक सुंदर गोड परी ....
तिच्यावरची नजर काहीकेल्या हटत न्हवती .माझी दुचाकी मात्र तिच्याच वेगेत पळत होती. थोड्या पुढे एका वळणावर उंचच उंच चहूकडे आपले बाहू पसरलेल्या त्या वृक्षाभोवती हळूच माझ्यासकट माझी दुचाकी आदळली. आणि खरच मी प्रेमात पडलो तो असा .
असच थोडा विरंगुळा ........
तुमची प्रतिक्रिया आवश्यक ....
- संकेत पाटेकर

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची
काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच . साध्या - छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .
खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ? बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि ...
काही सेकंदासाठी का होईना , आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव , कधीतरी भेटाव ..., मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं , प्रत्येकवेळी भेटाव - भेटत राहावं ...पण कधी तरी ..केव्हातरी ... या इवल्याश्या मनाला दिलासा ...
खर तर ...
एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल , एकमेकांविषयी ''आपलेपणाची'' भावना दृढ असेल, आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ''विश्वासाचं नातं' असत . आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.
अहो , नाती आहेत म्हणून आपण आहोत , आपण आहोत म्हणून आपलेपण आहे , एकमेकांवर प्रेम आहे .
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर
१६.०९.२०१३