बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

भावनिक खेळ ..

खरंच किती गंमत आहे ...ह्या भावनिक खेळामध्ये ...
कुणी भरभरूनं कौतुक करतं. आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल किंव्हा करत असलेल्या एखाद कुठल्या गोष्टीबद्दल ...तर कुणी चतकोर शब्द हि काढत नाही.
 उलट नाक मुरडून घेतात अन दुरूनच आपल्यावर नजर ठेऊन राहतात.
तर कुणी बोल लावून ' आपलंच (स्वतःच ) ते योग्य अस म्हणतं आपल्या मनावर आघात करत राहतात.

पण ह्या सर्वांतून ' आपलं मन' मात्र योग्य ते वळण घेत राहतं. पुढे जातं राहतं .

आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे .
पण मला वाटत सर्वप्रथम आपण शिकतो ते आपल्याच माणसांकडून ....ह्या समाजाकडून ....
ज्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळते मग ती शब्दिक असो वा हळुवार पाठीवरल्या मायेच्या स्पर्शाची.. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत राहतं . पुढे जाण्यासाठी.....नाही कि त्यात हुरळून जाण्यासाठी .

लोकं आकार देण्याचं काम करतात . अन  त्यातून आपण स्व:तहा घडत जातो. 
आपल्याला हवं तसं. 

असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१६.०९.२०१४

बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

तिचा वाढदिवस...

त्या दिवशी बरेच दिवसाने करी रोड ला उतरलो. एका गोडश्या बहिणीकडे, तिच्या सासरी , 'निमित्त होतं ते गणराजाचं दर्शन. तिने तसं आवर्जूनच बोलावलं होतं म्हणा .
दूर दूर चे लोकं ना आमच्याकडे दर्शनाला येतात. रांगच लागलेली असते एक ... गणपती बाप्पाची इतकी सुरेख अन सुंदर मूर्ती आहे ना... तू बघतच राहशील ...तू ये तर खरा... अन येताना कॅमेरा हि घेऊन ये फोटो काढायला. आपलेपणातून उमटलेले हे प्रेमाचे तिचे गोड शब्द ......
खरं तर मला नशीबवानचं म्हणावं लागेल . ..कारण एकेक फारच गोड अन प्रेमळ बहिणी लाभाल्यात त्यातलीच हि एक गोड बहिण. 'सुवर्णा' दूर असूनही नात्यातला संवाद नावाचा धागा अन विश्वास अजूनही तुटलेला नाही. तोच खेळकरपणा तोच शब्दातला गोडवा. नातं हे अस अन असंच असायला हवं. कायम .. टवटवीत ...प्रसन्नता बहाल करणार ...
गणराजाचे दिवस ..,सात दिवसाचे गणपती आपल्या घरी परतायच्या मार्गी होते. आणि नेमकचं त्याच दिवशी तिचा वाढदिवस एकत्रित असा जुळून आला होता . खर तर आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो त्यांचे वाढदिवस हि कायम लक्षात राहतो .
त्यामुळे तिचा वाढदिवस अर्थातच माझ्याही लक्षात होता. दरवर्षी प्रमाणे न चुकता न विसरता मी फोन करणार होतो. पण आदल्याच दिवशी तिचा फोन खणाणला .
संकेत , तू येतोयस ना ? केंव्हा येणार आहेस ? खरं तर गुरवारी मी कुठे बाहेर जात नाही. ऑफिस सोडून (कारण काय ते नंतर सांगेन कधीतरी ) म्हणून विचार करू लागलो. उद्या तर गुरवार, म्हणून शुक्रवार ठरवलं अन परवां येतो ...अस सांगून मी फोन ठेवून दिला .
पण पुन्हा आठवण झाली. अरे उद्या गुरवार अन हिचा वाढदिवस..मग काय हाच सुवर्ण क्षण साधून उद्याच जावू गणरायाच दर्शन घ्यायला. त्यानिमिताने वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा हि देता येतील . प्रत्यक्ष तिच्या उपस्थितीत . म्हणून पुन्हा तिला कॉल केला .
हेल्लो ,अगं ...उद्या ४ सप्टेंबर ना ?
हो....तुझ्या लक्षात आहे तर ? काही बोलण्याच्या आतच तिनेच सवाल केला ? हो तर ..अस कसं विसरेन. मी उद्याच येतो...तुझा वाढदिवस हि आहे नि बाप्पाचं दर्शन हि घेता येईल . ठीक आहे… ये मग, मी वाट पाहेन... असं बोलून फोन ठेवला .
दुसर्या दिवशी ऑफिसला निघालो. तिथून सुटल्यावरच ' करी रोड ' गाठणार होतो . ऑफिस मध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे कामकाज सुरु झालं. अन त्यातचं दुपारचे साडेबाराचे टोले पडले. अन तिचा फोन खणाणला.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....'हैप्पी बर्थडे' ताई ,’काही बोलण्याच्या आतंच मी तिला बर्थडे विश केल .
''काय रे माझा वाढदिवस अन मीच फोन करतेय तुला ? तुला फोन करायला हवं ना ?''
हो गं.....पण मी म्हटलं मी येणारच आहे तिथे , मग फोन वरून शुभेच्छा कशाला ? त्याची मजा आताच, ह्या क्षणीच का घालवायची . घरी आल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करेन ना ? ठीक आहे. thanku thanku... पण एक काम कर ... घरी कुणालाच माहित नाही आहे. माझा वाढदिवस आहे ते . . तू मला सर्वांसमोर विश नको करू. कळू देत मला हि ..कोणा कोणाच्या लक्षात आहे ते माझा वाढदिवस . ह्यांच्या (नवऱ्याच्या ) पण लक्षात नाही आहे.
हाहाहा .. म्हटलं गंमतच आहे. सांगून टाक ना मग ...तुझा वाढदिवस आहे ते, ...त्यात काय लपवायचं . 'नाही रे मला बघू देत ' तू विश नको करू ..पण वेळेत ये, अस बोलून तिने फोन ठेवून दिला.
मनातल्या मनात मला हसूच फुटत होतं. अन चिंतन हि ..ह्या गोष्टीच. कि खरच आपल्या ह्या वाढदिवसाला आपण आपल्या लाडक्या व्यक्तीच्या किंव्हा आपल्या अगदीच जवळच्या व्यक्तीच्या शुभेच्छांसाठी आपण अगदीच आतुरलेलो असतो. कधी आपल्या लाडक्या व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल, कधी भेटी गाठी होतील, ह्याचीच वाट पाहत असतो. काही वेळा त्याची पूर्तता होते . तर काही वेळा वाट पाहण्यातच दिवस ढळून जातो . तर असो... काही वेळाने पुन्हा तिचाच फोन आला...हे सांगायला कि, तू .सर्वांसमोरच मला विश कर..चालेल , त्यांच्या लक्षात तरी येईल माझा वाढदिवस आहे ते.
मी म्हटल बर..बर...ठीक आहे. येतो साडे सात वाजेपर्यंत.... पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही. घरी जाईपर्यंत कुणाच्या लक्षात हि न्हवतं तिचा वाढदिवस आहे ते . पण सर्वांसमोर जेंव्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेंव्हा घरातला हर एक सदस्य अचंबा करायला लागला.
सासू म्हणाली ...काय ग ! सांगायचंस ना ... ह्म्म्म.. पण मला बघायचं होत ..कोणा कोणाच्या लक्षात आहे ते.... अश्या तर्हेने तिचा वाढदिवस उशिरा का होईना सर्वांच्या लक्षात आला. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी मी मात्र निमित्त ठरलो . ह्याचा फार आनंद झाला. आनंदाच्या वलयात वाढदिवसाचा सुगंधित अत्तर सर्वत्र पसरला. आणि त्याने तिथला माहोलच बदलला .
जाता जाता तिचे गोड शब्द पुन्हा ....मनात ठसून गेले. जेवण चांगल झालं ना रे ? आवडलं ना ? मी केलेलं. मी म्हटलं..हो ग ताई...माझी आवडती भाजी जी होती. ..मेथी ची ...!
अन प्रेमाने वाढलेली कुठलीही गोष्ट ती गोडच असते न्हाई ...?
दोघांच्या हि चेहऱ्यावर एकच स्मित हास्य उमटलं अन पाउलं त्याच लयात घरच्या दिशेने निघू लागले. पुन्हा भेटू म्हणत .

नातं ...मग ते रक्ताचं असो वा नसो , त्यात आपलेपणा आला कि ते अधिक दृढ होत जातं . ते जन्मांच नातं बनतं ... मग कुणी कितीही कोसो दूर असो आपल्यापासून, त्याचं स्थान नेहमीच हृदयाशी असतं . नेहमीच धडधड करतं .
स्टेशन ला पोहचल्यावर तिला पुन्हा एकदा फोन केला . वाढ दिवसाच्या खूप सार्या प्रेमळ शुभेच्छा ताई ...पुन्हा एकदा अशीच हसत खेळत रहा नेहमी .....
दूर असूनही मनाशी घट्ट जुळलेल्या अश्या ह्या रेशीम गाठी ...
- संकेत य पाटेकर
१०.०९.२०१४