शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

‘संवादातलं मन’

आठवतोय तो संवाद .. शेवटचा अवघा मिनिट ...
तू म्हणाली होतीस… तुझ्या हळुवार पण काहीश्या भावमग्न  आवाजात   ..
''लिहत रहा म्हणून ..छान लिहितोस.. तू ''
मी हि म्हणालो होतो त्याच अदबीनं  ..बोलत रहा म्हणून ...
आठवतंय ?
शेवटचे  शब्द ..तुझ्या माझ्या हृदयातले. त्या संवादातले .
आठवतंय का ?

खरं  तर बोलायचं होत मला , त्याही पुढे  ...माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून .. सोबत रहा , बोलत रहा रे ,
पण नाही म्हणू शकलो. तो अधिकार मला असूनही न्हवताच.
हृदयास किती घाव पडत होते तेंव्हा ...ठाऊक आहे ? 

एकमेकांजवळ येऊन , कित्येक स्वप्नं नजरेशी रेखाटली होती आपण.
‘मला फोटो वगैरे काढायला आवडत नाही हं... आपण लग्नामध्ये एकचं फोटो काढायचा...’
इथपासून .. कितीतरी गोष्टी ऐकवल्या होत्यास तू अन मनातून कितीसा हसलो होतो तेंव्हा  मी .
पण त्या स्वप्नांची  ती रेख ..धूसर होत गेली हळूहळू ..

हाताची एक पकड , स्वप्ना पूर्तीच्या आधीच मोकळी होऊ लागली. असतील काही कारण त्याची हि किंव्हा आहेत ...

पण मन न्हवतं  मानत  रे .... घेतलेला तो हात ...आपल्या हातून मोकळं करू देणं . 
माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील ते मी केले.  आपल्यातले बंध तसेच टिकावे म्हणून ...
पण नाही सफल होता आले त्यात . बहुदा ..हेच नियतीला मान्य असावं .

आपल्या दोघांना एकत्र आणून वेडी स्वप्नं तना मनाशी जोडून ...त्याने योग्य वेळी योग्य ती खेळी केली . 
काय बरं सांगायचं असेल ह्या नियतीला अश्या प्रसंगातून ह्या घटनातून ? 
हृदयात जागा करून पुन्हा असं बेघर करून सोडून देणं ? 
प्रेमाचा अर्थ मनाशी लगावून द्यायचा होता . कि वेदनेची दाहकता  ? असो ...
जे झालं ते झालंच...
नातं मनातलं होत त्यामुळे ते मनातून तुटणं कदापि शक्य नाही .
ह्या आठवणींना मरण नाही. 

तुला ठाव आहे. ?
त्या संवादा नंतर , कित्येक दिवस मी वाट पाहत राहिलो..अगदी व्याकुळतेने ..भावविव्हळ  होत.
म्हटलं येईल तुझा फोन एकदा तरी  ...नक्की येईल. 
पण तो आवाज,  त्या आवाजातला नाद पुन्हा कानी घुमलाच नाही.

मी लिहत राहिलो ..तुझ्या एक एक आठवणींना ..शब्दमुलामा देत.
तू पाहत होतीस..वाचत होतीस  ...लाईक हि करत होतीस .
पण ते सगळं ह्या आभासी दुनियेत..........

प्रत्यक्ष बोलणं ..भेटणं ...नाहीच पुन्हा…

मी मात्र लिहतोय अजूनही ...  तुझ्यासाठी .


संवादातलं मन..
हृदया एक स्वप्नं सखी…
संकेत पाटेकर
30/09/2016 




बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

जीवन कोणावाचूनहि थांबत नाही ...

मनमोकळं हास्य घेऊन, किती सहजतेने आयुष्यात आलीस तू .. हो ना ?
जितक्या सहजतेने आलीस तितक्याच सहजतेने...एक दिवस निघून हि गेलीस.. 
मागे हि वळून पहिले नाहीस तू ? एकदाही ...
भिरभिरणारं एखाद सुंदर फुलपाखरू...आपल्या कळत नकळतं जसं हाती विसावंतं , मनमोकळं हसू उजळवतं , आनंद देतं आणि भावनिकतेची कड ओलावतं हळुवार निघून जातंतसं झालंय... माझं अगदी..

कळलचं नाही ...कधी आलीस ,निघून गेलीस तू...
कळले इतकेचं...ते श्वास रोखुनी गेलीस तू...

एकमेकां सहवासातले ते सोनेरी क्षण ...तेच आयुष्यं झालंय ...माझं...

किती जवळ होतो रे आपण...
बघ ..किती दूर निघूनि गेलो ....

हाती उरलेत ते केवळ आठवणीतले उबदार क्षण ...
अन भावनेने व्याकुळलेल्या अन ओथंबलेल्या ह्या प्रेमसरी ...त्यातच ओलचिंब झालोयं मी...

बघ, ऐकू येतेयं का ....... हृदयी साद ...... ?
बघ जरा माझ्याकडे .. बघ ना ...
हसतोय मी ...पाहिलंस माझं हास्य....? कुणी हि सहज वेडा म्हणेल............

कसा वेडासारखा हसतोय ..स्वतःशीच ...हाहाहा...
पण त्यांना कुठे कळणार .... का हसतोयं ते ....? 
गर्द आठवणीच्या धुंद नशेत झुळतोय मी ..आणि नजरेसमोर... तू आहेस ....केवळ तू ....

जीवन कोणावाचूनहि थांबत नाही बघ ...  पण सहजीवनातल्या त्या क्षणीक ( क्षणासोबत विसावलेल्या..बेधुंद ) आठवणी... साथ सोबत सोडत नाही ..हे हि खरं, नाही का ?
बघ , जरा मागे वळून ....अजूनही झुळतोय मी ............तुझ्या प्रेमरंगात ...

असंच काही सुचलेलं..
मनातलं काही ..- संकेत पाटेकर 
20.09.2016 



शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

ऐक सखे...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
काही जुन्या क्षणांना..
जरा गोंजरायचे होते..

क्षण हसवायचे होते..
जरा रुसवायचे होते..
मनं, नव्या क्षणांशी ..
जरा मिसळायचे होते..

भाव निरखायचे होते..
हृदयी जमवायचे होते..
मन तुझे आणि माझे..
जरा उसवायचे होते..

नाते झुलवायचे होते..
जरा फुलवायचे होते..
गंध मोकळ्या मनाचे..
तळ शोधायचे होते...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
ऐक सखे.....
जरा भेटायचे होते

~ संकेत पाटेकर
१७/०९/२०१६

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

आज पावसाने आनंद दिला...

आज पावसाने आनंद दिला...

वय वर्ष साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास असणाऱ्या त्या आजी आणि पावसाच्या नितळत्या सरींसोबत, रस्त्याच्या कडेकडेनं  ..हळुवार , चालता बोलता झालेला  आमचा मन मोकळा संवाद...

अगदी क्षणभराची ओळख, पंधरा एक मिनिटे ,  अन  त्या एवढ्याश्या ओळखींमध्ये सुद्धा माणसं आपलं जीवनपट दिल खुलास मांडतात . त्याचा हा अनुभव. 

सकाळची साडे आठची वेळ , नेहमीच्या घाईगडबडीत आपला ऑफिस साठी निघालो. 
नित्य नेहेमीची लोकल आपली वाट पाहत बसणार नाही . म्हणून पाऊलं झपझप पुढे  पडत होती. 
पण पावसाने ऐनवेळी मुसंडी मारल्याने पाउलांचा वेग काहीसा मंदावला होता. तरीही  दहा एक मिनिटाच्या चालीनंतर कुठेसा भास्कर कॉलनीतून ..हितवर्धिनी मैदानाच्या आसपास पोहचलो. स्टेशन (ठाणे ) अजून हि दहा एक मिनिटाच्या अंतरावर होतं.  

पाऊस मनाची ओघळती टपटप रस्त्याशी सुरुच होती. छत्रीचा आडोसा घेतं माणसं ये जा करत होती. 
त्याच रस्त्याकडेनं एक आजी मात्र , डोक्याशी ओढणी घेतं ... पावसाच्या सरींपासून स्वतःला  सांभाळत,  हळुवार (वयोमानाप्रमाणे )एकटक अश्या  पुढे सरत होत्या. 

पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्याने , छत्रीअभावी  त्या बाहेर निघाल्या असाव्यात ...असा एक  साधा सोपा कयास बांधत मी पुढे सरलो. 
ह्या वयोमानाप्रमाणे  पावसात भिजणे म्हणजे आजारला आमंत्रण देणे वा ओढवून घेणे आहे. असं स्वतःशी म्हणत , त्यांच्या जवळ गेलो. डोईवरी छत्री धरली. 

त्यांनी हळुवार नजरेने माझ्याकडे पाहिलं. 
अन धीम्या स्वरात म्हणाले '' अरे तुला उशीर होईल...कामावर जायला ?''  मी हि तितक्याच अदबीने  म्हणालो , नाही ..नाही , अजून वेळ आहे, नाही होतं उशीर...
कुठे जायचं आहे तुम्हाला  ? 
' तो समोर वटवृक्ष  आहे नं तिथे राहते मी ...पाचव्या मजल्यावर ...' समोर बोट दाखवत त्या म्हणाल्या, 
'अच्छा ...! चला मग,  तिथवर  सोडतो मी तुम्हाला ' ...असं म्हणत मी त्यांच्यासोबत चालू लागलो. 

चालता बोलता दोन अनोळखी 'मनं' क्षणातच मोकळ्या संवादात कधी  मिसळून गेली.. ते कळलंच नाही . 
मनातलं पाखरू उघडपणे भिरभिरू लागलं . 

त्यांनी त्यांचा जीवनपट थोडक्यात सांगायला सुरवात केली . मी  ते सगळं मनाशी टिपत होतो. 
आडनाव - धारप...
वय वर्ष साधारण 65 ते 70 च्या आसपास...
 मूळचे नागपूरकर , नंतर गिरगाव ..मग आता ठाणे.  
पेशा - शिक्षकी - भायखळा येथे एका शाळेत  गणित अन विज्ञान विषय घेऊन आठवी ते दहावी वर्गाला त्या शिकवत असत . गणित हे त्यांचा आवडीचा विषय .  
आता मात्र रिटायर्ड आहेत. 

लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं . तरीही त्या जिद्दीने  शिकल्या. आपलं शिक्षण पूर्ण केलं . अन शाळेत रुजू झाले  . त्यांच्या भावंडात त्या एकट्याच जास्त शिकलेल्या. त्यांना एकूण तीन भाऊ ( दोघं आता हयात नाहीत )  अश्या एक ना अनेक गोष्टी त्या  सांगू लागल्या . 
गणपतीचा त्या वेळेसचा उत्सव , आताच उत्सव ह्यावर हि थोडीफार  चर्चा रंगली..अन चालता बोलता आम्ही त्यांच्या वटवृक्ष असलेल्या संकुलात येऊन पोहचलो.  

त्यांनी चहासाठी आग्रह धरला. '' घरी ये ...बैस , चहा  घेऊन जा '' 
कामावर जायचं असल्याने,  मी  पुन्हा कधी , नक्की येईन असं म्हणत माघारी वळलो. नवा क्षण अन नवा आनंद मनात साठवत....

आपल्या रोजच्या आयुष्यात,  ह्या  जगण्यात अगदी लहान सहान गोष्टीतही किती आनंद असतो बघा... 
''आनंद देण्यातहि आहे अन आनंद घेण्यातही ''  . आज  मला आनंद मिळाला तो आशीर्वादाच्या रूपाने ...डोईवरी छत्र  धरत..

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. 

- संकेत पाटेकर 
08.09.2016