रविवार, १४ मे, २०२३

मातृदिन..आई म्हणजे

आई म्हणजे सुखाची चाहूल.. 

आई म्हणजे जगण्यातला सूर ..

आई असते श्वास ..भरवलेला  तो एक एक घास 

'' एक चिऊचा . एक काऊचा   आणि एक माझ्या बाळाचा ''

 असं म्हणत लहानाची मोठं करणारी, संस्कार घडवणारी .वात्सल्यसिंधू आई , 

'' आई असते जन्मदायी आभाळ मनाची पुण्याई ''

  मातृदिनाच्या शुभेच्छा 

 - संकेत य पाटेकर 


मातृदिन..आई म्हणजे


शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

काल्हेर रेती बंदर - आसपासची भटकंती | Kalher Reti Bunder


काल्हेर रेती बंदर - आसपासची भटकंती | Kalher Reti Bunder

आपण जिथे राहतो त्याच्या आसपासच अशी काही सुंदर ठिकाण असतात. जिथे गेलो की मन प्रसन्न होवून जातं. शरीर मनाभोवती असलेलं नको त्या विचारांची जळमटं त्या निसर्गमय जागी पोहचताच कुठेशी गुडूप होऊन जातात आणि तन मन कसं रिफ्रेश होतं.

हे ठिकाण ही असंच काहीसं .. समस्त काल्हेरकरांसाठी सकाळ संध्याकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठीच एक उत्तम ठिकाण म्हणजे काल्हेरचं रेती बंदर हे ठीकाण होय. ह्यास विसर्जन घाट असेही म्हणतात. लहान मुलं, तरुण आणि जेष्ठ मंडळीचा सकाळ सायंकाळ येथे राबता असतो. कुटुंबियांसह अनेक मंडळी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी म्हणून इथे येत असतात. येथेच बंदऱ्या मारुतीचे प्रशस्त मंदिर देखील आहे. मंदीराच्या आवारात निवांत बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. मंदिरातच विठ्ठल रखुमाईची मूर्ती, श्री गणेश मूर्ती, श्री साई बाबांची मूर्ती आणि शिवलिंग आहे. क्रिकेटसाठी प्रशस्त असं मोकळं क्रीडांगण आहे. छान बाग आहे. पण सध्या त्याचे काम चालू आहे. लोणावळ्यातील राजमाची परिसरात उगम पावणारी उल्हाद नदी हि पुणे रायगड ठाणे जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचं अंतर पार करत ..कल्याण खाडीजवळून पुढे इथूनच समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे सांजवेळेचे इथले दृश्य फारच मोहक आणि सुंदर दिसते त्यातच सूर्योदय आणि सूर्यास्त हे माझे खास आवडीचे आणि जिव्हाळ्याचे विषय. त्यामुळे वेळ मिळताच क्षितिजाचे हे रंगरूप पाहण्याकरिता, उगवत्या आणि मावळत्या सूर्यनारायणाची हसरी मुद्रा आणि त्या छटा पाहण्याकरिता येथे आमचं येणं जाणं हे सुरुच असतं. नुकतीच इथे बोटिंग सेवा देखील सुरु झाली आहे. (संध्याकाळी ५ ते रात्री ८ ते ११ ) प्रति मानसी ५० रुपये तिकीट. अर्धा तासाभराची हि सैर सफर आपल्याला इथल्या इथे मनसोक्त आनंद देऊन जाते. हे मात्र नक्की - संकेत पाटेकर काल्हेर रेती बंदर - भिवंडी ---------------------------------------------------------------------------------------------------- कसे याल ? ठाणे सिडको येथून शेअर रिक्षा पकडायची ( ४० रुपये सीट ) आणि काल्हेर पाईप लाईनला उतरायचं. (२५-३० मिनिट) तेथून चालत अथवा रिक्षाने इथपर्यंत पोहचता येते. काल्हेर पाईप लाईन ते रेती बंदर साधारण १ किलिमीटर अंतर आहे. सिडको येथून बसेस हि उपलब्ध आहे. पूर्णा, काल्हेर

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

श्री स्वामी समर्थ मठ - ( नांदिवली ) डोंबिवली पूर्व

 प्रशस्त जागा, मनाला प्रसन्न बहाल करणारं भक्तीमय आणि शांतप्रिय वातावरण, मन एकाग्र करण्यासाठी असलेलं ध्यानमंदिर आणि एकूणच परिसर..

श्री स्वामी समर्थ मठ - ( नांदिवली ) डोंबिवली पूर्व



अंबरनाथ शिवमंदिर (Ambernath Shiv Mandir) महाराष्ट्रातील प्राचीन भूमिज मंदिर

 मुंबई ठाणे  पासून अंबरनाथ रेल्वे स्थानक अगदी तासाभरावर आहे.  

येथून सुमारे दोन अडीच  किलोमीटर अंतरावर अंबरनाथचं  प्राचीन शिवालय उभं आहे. रिक्षा करून ह्या मंदिरापर्यंत आपल्याला पोचता येतं. साधारण पाच दहा मिनिटातच शिवमंदिर येथे पोहोचता येतं.   मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे  प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून, ह्या प्रवेशद्वाराव्यक्तिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार इथे आपल्याला पाहायला मिळतात. युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत अंबरनाथच्या  ह्या प्राचीन मंदिराचा  देखील समावेश आहे.  हि नक्कीच अभिमानस्पद गोष्ट आहे. मुख्य प्रवेशद्वाराशीच  शिवाचे वाहन असलेले दोन नंदी आहेत. त्यांचं दर्शन घेत मुख्य प्रवेशद्वारातून आपण सभामंडपात प्रवेश करतो. आणि तिथून गर्भगृहात .. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू असे शिवलिंग आहे. त्यास अंबरेश्वर म्हणून हि संबोधलं जातं.  वालधुनी नदीच्या काठी वसलेलं हे अंबरनाथचे  शिवमंदिर आपला ऐतिहासिक वारसा जपून आहे.  उत्तर कोकणातील शिलाहार राजवटीतील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली आणि राजा मुम्मुणीराज यांच्या कारकिर्दीत शक संवत ९८२ म्हणजे इसवीसन १० जुलै १०६० रोजी   ह्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असा उल्लेख मंदिरवर असलेल्या शिलालेखातून मिळतो.  अंबरनाथच हे प्राचीन शिवमंदिर भूमिज मंदिर म्हणून ओळखलं  जात. .हे शिवालय अद्भुत शिल्पकलेचा आणि स्थापत्याचा  उत्रकृष्ट नमुना आहे  आणि आपल्या महाराष्ट्राचं  ह्या आपल्या अंबरनाथ  शहराचं खरं तर हे भूषण ... त्यामुळे एकदा वेळ काढून आणि आवर्जून एकदा भेट द्यायला तर हवीच.  - संकेत य. पाटेकर


अंबरनाथ शिवमंदिर (Ambernath Shiv Mandir) महाराष्ट्रातील प्राचीन भूमिज मंदिर



शुक्रवार, ३ जून, २०२२

दोन डोंगराच्या हिरव्याशार वनश्रीतुन ...
हसत बागडत आढेवेढे घेत झुळझुळणारी नदी... 
आपल्या मधुर कंठ स्वर-सुरातून वातावरण चैतन्यमय करणारे आणि 
आकाशी मुक्त घिरट्या घेणारे स्वच्छंदी पाखरं... 
 फुला ताटवांचा सुगंधित लेप घेऊन आपल्या शरीर मनावर थंडाव्याचा शिडकावा करत स्मित हास्य उमटवणारा उनाड वारा... आणि वाडीतल्या टोकाशी...प्रशस्त मोकळ्या जागेत...
शांत उभं असलेलं आणि प्रसन्नता बहाल करणारं देऊळ..
आणि ह्या सर्वांशी संवाद साधणारे आपण... 
 कोकण म्हणजे आनंद 
 हवे हवेसे वाटणारे क्षण 
 - संकेत पाटेकर



शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

अशिक्षितपणाचं लेबल

मला ना ते हल्ली ‘तुम्ही शिकलेली माणसं असं …….’ हे वाक्य कुठं ऐकलं ना ( म्हणजे माझ्या स्वतःकडून आलं तरीही ) मला हसायलाच येतं. म्हणजे शिकलेल्या माणसांना एका चौकटीत बसून मोकळे झालोत आपण ? म्हणजे काय तर अशिक्षितपणाचा ठप्पा ( अशिक्षितपणाचं लेबल ) आपल्या वाट्याला येईल अशी कामे शिकलेल्या माणसाने कधी करूच नये वा त्याच्याकडून अशी कामं कधी घडता कामाचं नये, असा अलिखित नियमच जणू लागू केलाय ? त्याने तेच करावं जे इतरांना ( एक विशिष्ट असा शिक्षित वर्ग ज्याला ते ) योग्य वाटतं ? बाकी त्याने काही करू नये ? बरोबर ? अनवधाने..चुकून काही घडलंच तर आहेच चिखलफेक दगडफेक शब्दांची, अशी तशी …ह्याच लोक्कांकडून .. आता माणूस आहे म्हटला तर तो इथे तिथे थोडा गडबडणारच, साहजिकच आहे. यंत्रासारखं स्थिर अचूक राहणं वा राबणं त्याला थोडंच ना जमणार आहे. तो थकणार, आळस करणार, गप्पा गोष्टीत रमणार ….आणि कधी कधी गडबडणारच… तोल जातोच होsss माणूस आहे म्हटलं कि .. हो कि नाही ? सर्वगुणसंपन्न एखाद विरळाच होssssss , म्हणूनच म्हणतोय, ज्याचं त्याने स्वतःला पारखावं. स्वतःला उभं करावं.. कुठं काय अडलं गड्बडलंच तर … अशिक्षितपणाचं लेबल मात्र कुणावर चिटकू नये. स्वतःने हि आणि स्वतःला सुशिक्षित समजून घेणाऱ्यांनीही.. गंमत म्हणजे आपण त्यातच श्रेष्ठ असतो. -संकेत पाटेकर

बुधवार, ८ जुलै, २०२०

If you Don’t mind…

काल ऑफिसमध्ये नव्याने एक मुलगी जॉईन झाली.  ते हि आमच्याच Design Department मध्ये ,
पहिलाच दिवस असल्याने..काम काज समजून घेण्याकरिता ती बाजूला येऊन बसली. बाजूच्या सीटवर आणि
थोडं इकडचं तिकडचं समजून घेतल्यावर, काही बोलणं झाल्यावर लागलिचं तिने एक सवाल टाकला.
अगदी स्पष्टपणे..,
If you Don’t mind…
तुमची सॅलरी किती आहे ?

मी काही क्षण स्तब्ध पुतळ्यासारखा झालो.
क्षणभराचा तो क्षणिक झटका..म्हणा हवा तर..
म्हटलं काय धाडसी मुलगी आहे हि, किती हे धाडस..

पहिलाच दिवस..तो हि आता कुठे सुरु झालाय आणि असा प्रश्न.. !

खरं तर मुलगा असता तर सांगायला काही प्रश्न न्हवता.. पण प्रश्न आता प्रतिष्ठेचा आणि असलेल्या त्या पोस्ट चा होता..

नव्याने आलेल्या मुलीला, पहिल्याच दिवशी आपली सॅलरी सांगायची म्हणजे ? प्रश्नांची उभी मांदियाळीचं सुरु झाली.

मला माझ्या आधीच्या कंपनीचे बॉस आठवले. ते म्हणायचे,

मुलींनी मुलांची ‘सॅलरी’ कधी विचारू नये आणि मुलांनी मुलींचं वय.

मी स्मित हास्य तेवढं केलं तिच्यापुढे आणि निमूट गप्प राहिलो. क्षणभर..

पण तीचं त्यात काही समाधान झालेलं दिसलं नाही.

मग शेवटी सरळ सरळ सांगूनचं टाकलं.
म्हटलं काय होणार आहे सांगून…सांगून..
हा हि एवढी ..अमुक तमुक..आहे.

तिला बरं वाटलं असावं ते ऐकून..

मी मात्र त्या शब्दाला एकनिष्ठ राहिलो.
तिचं वय विचारलं नाही.

सहज जमलेल्या_गमती जमती

– संकेत
visit : www.sanketpatekar.com

रविवार, १९ एप्रिल, २०२०

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..



आज कामाचा इतका काही ताण न्हवता.मोकळा असा वेळ मिळाल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून काहीतरी वाचावे म्हणून प्रतिलिपी वर गेलो. तिथल्या मोजक्या अश्या कथा वाचण्यात इतका दंग झालो कि त्यातच सहा कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. 
ऑफिस मधून निघायची वेळ ती. पटापटा आवरतं घेतलं.
कॉम्पुटर बंद केला. डेक्सवरच्या फाईल्स, ड्राइंग्स जागच्या जागी ठेवल्या.
आणि अंधेरीकडे निघालो. ऑफिस ते अंधेरी स्टेशन पायी गाठलं. कालच लोकल पास संपल्याने, तिकीट काउंटर वर जाऊन ‘जोगेश्वरी ते कळवा’ असा महिन्याभराचा पास काढून घेतला आणि फलाटाकडे निघालो.
ऐन गर्दीतून मार्ग काढत पुढे सरकत होतो.
तेवेढ्यात काहीतरी राहून गेल्याचं लक्षात आलं.
पण नक्की काय ते कळत न्हवतं. म्हणून उगाच शर्टाचे खिसे चपापून पाहिले. बॅग- खण एकेक तपासून पहिले आणि लक्षात आलं.
अरेच्चा..!
आपण आपला अमूल्य ठेवा तर ऑफिस मधेच विसरून आलो. श्याsssss श्याsssss..श्याsssss..
जे ह्यापूर्वी कधी घडलं नाही ते पहिल्यांदा घडून आलं.

मुळात एकमेकांच्या सहवासाची इतकी सवय कि हे घडलं कसं ह्याच विचारात होतो. पण त्याचं कारण हि लगेच ध्यानीं आलं. आणि मनातूनच स्वतःला बडबडत राहिलो.
एव्हाना सात वाजत आले होते. पुन्हा ऑफिसला जाणे म्हणजे कसरत..
काय करावं तो निर्णय होत न्हवता. पण एकदाचा तो घेतला.

ऑफिसला तडक निघालो. पोहचता पोहचता पंचवीस एक मिनिटे निघून गेली. चालून चालून शरीर घामाने डबडबलेलं. पूर्णता घामाने निथळलो होतो.
तसाच ऑफिस मध्ये पोहचलो.
बिग बॉस अजूनही ऑफिसलाच होते.
त्यांना कळायला नको म्हणून त्यांच्या नकळत आत शिरलो.

ऑफिसात उपस्थित असलेल्या एका मित्रांला डेस्क वरचा तो जिवाभावाचा मोबाईल आणायला सांगितला. त्याने तो आणून दिला. तेंव्हा मोबाईल हाती आल्याचा किती आनंद झाला म्हणून सांगू ?
ते पाहून मित्राच्या कपाळी मात्र रेषा उमटल्या, त्याने प्रश्न केला.
काय रे, ह्या मोबाईलसाठी इतका धावत पळत आलास तो..इतक्या लांब पुन्हा..
ठेवला असता ड्रॉवर मध्ये…, एका दिवसाने काय फरक पडला असता? 

मी क्षणभर हसलो.
कधीतरी कुठेशी वाचनात आलेल्या त्या ओळी पटकन ओठी स्थिरावल्या.
खुद से ज्यादा संभालकर रखता हूं मोबाइल अपना, क्योंकि रिश्ते सारे अब इसी मै कैद है ।

माझंच मी हसलो अन चालू पडलो..
घराच्या दिशेने..
संकेत पाटेकर

 चॅनेल Subscribe करायला विसरू नका. 
''क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं .. ''
https://youtu.be/Am9KaQcr94g 


बुधवार, १ एप्रिल, २०२०

त्या बसल्या जागेवर..

झाडांना ही स्पर्शाची जाणीव होते का ?
मनात विचारांची कोंडी सुरू झाली आणि मोबाईलवर चुलबुल करत फिरणारे हात, तसेच मागे घेत. उठून उभा राहिलो.
मोबाईलचा नेट बंद करून, चार्जिंगला लावत ठेवला. आणि सरळ...पायात चपलांची जोडी घालत, झप झप पाऊलानिशी, शेत बांधावरच्या आंबाच्या झाडाखाली येऊन बसलो.

मोकळं उघडं माळरान ते...उन्हाचं तिडीक सर्वत्र पसरलेलं असताना,
रणरणत्या एवढ्या उन्हात ही डोईवर आभाळ घेऊन, सावलीचं छत्र धरणारं हे झाड पाहिलं आणि स्मित उजळलं अन त्याबरोबर प्रश्न ही पडला?
कसं काय जमतं बुवा ह्यांना?

इतकं उन्ह अंगावर घेऊन ही...सोसूनही, सळसळत्या हिरव्या पानांचा तो नाद...त्यातून उठणारा हास्याचा खळखळाट, कुठे ही चिंतेची..दुखऱ्या मनाचा लवलेश नाही.
इतकंच नाही.
अगदी मुळापासून शेंड्यापर्यन्त अगणित जीव आपलं बस्तान बांधून असतानाही..
त्यांची खरडपट्टी सुरू असतानाही,
कुठेही वेदनांचा आक्रोश नाही. कुठलाही हेवा दावा नाही?

कसं काय जमतं ?

मी बसल्या जागेवरून उठलो आणि हळूच झाडाच्या बुध्याला, फांद्यांना स्पर्श करू लागलो.
घट्ट एक मिठीच मारावी असं मनात होतं पण ते मनातच ठेवलं आणि
म्हटलं बघावं , ह्यांना ही भावनांचा सख्य आहे का?
प्रेमाचा उमाळा ह्यांना ही कळतो का ? स्पर्शाची जाणीव ह्यांना ही होते का ?
नुसताच स्पर्श नाही तर मनातलं ही ओळखता येत असेल का ? मनातलं ओळखलं तर आपल्या वेदनांना ही आणि आत उधळलेल्या असंख्य प्रश्नांना ही थोपवता येत असेल का ? प्रश्नांचा असा मोगोमाग तडाखा सुरू झाला.आणि नजर कान एकाकी फांदीवरल्या त्या कोवळ्या पांनाकडे वळली.

उन्हाच्या किरणांनी ते लक्ख उठून दिसत होतं. हिरवाईंचा कोंब फुटला होता. चैतन्य सळसळत होतं.
आणि जणू माझ्याकडे बघून टिंगल टवाळ्याानिशी ते खळखळून हसत होतं.
- संकेत पाटेकर
०१ एप्रिल २०२०
"मनआभाळ"
www.sanketpatekar.com

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

जीवन प्रवास

अस वाटतं हे चौकटीतले आठ नऊ तासाचे ऑफिसचे काम धंदे सोडून ....
सरळ... मुक्तवाटे ..ह्या माझ्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातुनी वणवण भटकत राहावे. 

मैलो मैलांचा वेड्या वळणाचा खडतर प्रवास साधत .. 
इथल्या लोक संस्कृतीचा लोकजीवनाचा, मानवतेचा तसेच दुखीव अश्रूंचा आणि निसर्गाच्या अलौकिक, अद्भुत सौंदर्यतेचा आणि तिथल्या हर एक घटकांचा नजरेशी आढावा घेत..
जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत झेप घ्यावी. 

सामाजिक बांधिलकी जपत हवं त्या समयी स्वतःला मानवतेशी जोडून घ्यावे.(.निर्मळतेने) 
...तसेच लेखणीने एक एक अनुभव शब्दबद्ध करत रहावे. 
अन त्याबरोबर कलेशी हि संधान बांधत कलागुणाशी (मग ते छायाचित्रण , अभिनय , साहित्य , वा इतर कुठल्याही कला क्षेत्र असो ..त्यांशी ) जुळवून घेत त्यात बेधुंद व्हावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम अन शांतीचा अनमोल संदेश देत..
आपलेपणाने एक एक नाती हृदयाशी कवटाळत..
लोकांच्या हृदय मंदिरात स्थान मिळवत हा देह अलगद ह्या मातीशी ठेवून..

 ह्या जगाचा अखेरचा निरोप घ्यावा. 
बस्स....
जीवन प्रवास हा असाच हवा.


- संकेत पाटेकर
१६.०४.२०१६

प्रेम हे मोजता येत नाही रे , त्याला आकार माप अस काही नाही .म्हणून ते मिट्विता ही येत नाही .
ते फ़क्त अनुभवता येतं. जाणता येतं …
 हृदयातल्या भाव गीतेतून .. नजरेतल्या अथांगतेतून, सप्त सुरांच्या अमोघ वाणीतून, स्नेह पूर्ण स्पर्शातून , अबोल्यातून, दुराव्यातून..आणि आपलेपणाच्या जिव्हाळीक नात्यातून..
आणि प्रेम हे एकच शाश्वत आणि सत्य , मी मानतो ..जे अक्षय आहे. ज्याला मरण नाही. 
आणि हेच एकमेव 'प्रेमरत्न' मी तुला देऊ शकतो . 
. 
बोल...आयुष्य भरासाठी तुझि साथ मला देशील ? 
माझ्या सारख्या वेडगळ , साधसचं जीवन जगणाऱ्या ...अन साधसचं राहणीमान असलेल्या ..
मुलाशी लग्न करशील ? तयार आहेस ? 
तू चंद्र तारे म्हणशील तर , ते तुला मी कदापि आणून देणारं नाही हा ...अश्या वायफळ बाता मी करणार नाही. पण कले कलेतून वाढत जाणाऱ्या त्या चंद्राची शीतलता अन मिणमिणत्या ताऱ्यांची लखलख आणि ते अथांग विश्व तुला जवळून अनुभवायला नक्कीच मिळेल. ह्याची खात्री देतो .
कसं ते माझ्यावर सोपवं ...त्यातला आनंद तुला नक्कीच मिळेल. 
आजवर तुझ्यावर ओघाने प्रेम करत आलोयं .. तो ओघ ह्या पुढे हि कायम राहील . पण मनातून उमटलेली प्रत्येक भावना तू त्या त्या वेळेस समजून घेशील हि आशा व्यक्त करतो. 

प्रेम ही तशी एक आतंरिक भावना आहे ...सहजतेतून , सहजतेत ओघळलेली ..मिसळलेली. 
ती सहजता ती ओघळता तुझ्या माझ्यात यायला हवी. .....तरच हे नातं उमलेलं आणि बहरेल ....
शेवटच्या श्वासा अखेरपर्यंत …..

बोल , लग्न करशील माझ्याशी ? 
पुन्हा विचार कर ...आणि काय तो निर्णय दे ...आता मात्र उशीर नको करू..
आधीच खूप उशीर झालायं... 
तुझाच ....
असंच..काही सुचलेलं . 
- संकेत - १९.०५.२०१६
 ____________________________________________________________________


मी काही कृष्ण नाही आहे रे ... तो सावळारुपी ईश्वरी रूप , प्रत्येक हृदय मंदिरात आपलं हक्काचं स्थान मिळवून , नुसत्या एका सादेला हि हवं तेंव्हा , एकाच वेळी प्रतिसाद देणारा ...
प्रत्येकाच्या हृदयी गाभाऱ्यात आपलं सावळारुपी अस्तित्व कायम खिळवून मन ज्योती उजळवून देणारा , समोरील मनातल अचूक हेरणारा ..आणि अपेक्षापूर्ती करणारा ...... नैराश्याचा , अविचारीपणाचा सखोल नायनाट करणारा ...
मी ...मी आहे, साधासाच अन सामान्य , कृष्णाई रूपासारखं सर्वत्र नाही. पण काही हृदयी घरात नक्कीच आपलेपणाचं स्थान मिळविलेला...
पण त्यासारखं मला कुठेय रे , सर्वत्र नांदता येतंय ..
मनात दडलेल्या अनेकानेक प्रश्नांना ,चिंतांना अन आसवांना कुठे रे शमविता येतंय ..
अपेक्षांचे निरपेक्ष भार हि उचलण्याची तितकी क्षमता नाहीये रे माझ्यात ...
पण कुठेशी मनमोकळा प्रयत्न असतोच ना सातत्याने , कुणा हिरमुसल्या कळीला , हास्य चैतन्याचा सुगंध लेवून आपलेपणाने फुलवून देण्याचा .., कुणा एखाद्याशी आपलेपणाच्या मृदू शब्दानं आधारवड होण्याचा ..
मान अपमान सार सोडून नाती गुंफण्याचा अन जपण्याचा ..

पण तरीही मला ह्या सर्वाना एकत्रित बांधता येत नाही आहे. नात्यातली कुठलीशी घडी हळूच कधी मोकळी होते ..ते कळून येत नाही. आणि जेंव्हा कळत ..तेंव्हा अंतर वाढलेलं असतं. 
आयुष्य जगताना , अन ह्या वेळे सोबत पुढे सरताना प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं असतं. 

बस्स ह्या प्रवासात आपलेपणाने जोडलेले हात अन त्यांची साथ , नकळत कधी सुटू नये..इतकंच.. 
असंच काहीस... 
- संकेत



आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी 
त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो...नवी ओळख असते नवं नातं गुंफलेलं असतं..... 
अन अश्यात  काही शब्द काही ओळी नकळतओठाशी येतात ...

              सोनसळी आठवणी
              लागे बोलाया चालाया 
              दिन गुलाब गुलाब 
              प्रीत लागली फुलाया !   
              - संकेत
कधी चारोळी रुपात तर कधी ...कवितेच्या स्वर सागरातून ....
तिच्या हसऱ्या नजरेशी ...अन भावगंध चेहऱ्याशी अन मनाशी गोड संवाद साधत .....
अश्याच काही चारोळ्या .......प्रेमातल्या अन वियोगातल्या ....

प्रेम म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून
जावी तशी...पूर्णतः समर्पण ...
  
                 काही नाती हि नकळत                            

                 जुळली जातात... 
                 प्रेमाच्या बंधनात अलगद 
                 जखडली जातात ...
                 - संकेत                   ~ ~ ~ ~ ~             सहज एखादी मैत्री जुळते 
                                                                            मैत्रीतून नवी ओळख घडते .......
                                                                                             -संकेत  
                   प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
                  डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
                    - संकेत                 
~ ~ ~ ~ ~ 
                                                                            प्रेम म्हणजे काय ?
                                                                            मी अन तू
                                                                            माझ्या  मनातली तू
                                                                            तुझ्या  मनातला मी  , हे ना ?                                                                                                           -संकेत
                 

                 एकटक तुझ्या नजरेशी
                  छेडत असतो वारंवार
                  अन त्या नजरेतुनीच मिळवत
                  जातो , प्रेमाचे हे शब्दसार ...
                   - संकेत                
                                                 ~ ~ ~ ~ ~ 
 संवाद हा नात्यातला एक महत्वाचा दुवा ... तो असतो म्हणून तर नात्यात  गोडवा असतो.  आणि अश्या संवादातूनच असे नट खट प्रश्न पडतात . ...
               ती म्हणते अगदी लाडीने,
               का नाही तू राग व्यक्त करतं
               मी म्हणतो तितक्याच प्रेमओढीने
              का नाही तू प्रेम व्यक्त करतं...
                - संकेत                    ~ ~ ~ ~ ~ 

               तुझं माझ्यावर प्रेम किती ?
               हे शब्दात कसे मांडावे
               अमर्याद ह्या शब्दाला , सांग
               प्रेमाने कसे भागावे ? 
                - संकेत                    
                                                   ~ ~ ~ ~ ~ 
               आज तिनेही तिच्या देवाकडे 
               एक 'मागणे' मागितले असेल
                कर जोडूनी मनोभावे 'मला' च वरिले असेल.  
                हरतालका विशेष .. – संकेत                      
                                                   
                                                               ~ ~ ~ ~ ~ 
               तिचं एक स्वप्नं आहे
               तिला 'तो' मिळावा , आयुष्यभरासाठी...
               त्याची हि एक इच्छा आहे
               तिनं एकदा 'भेटावं' ते स्वप्नं साकारन्यासाठी...
              - संकु                                                                                     

         
 माणूस प्रेमात पडला कि त्याला  स्वतःचे आत्मभान हि  उरत नाही.   भास आभास ..ह्यांनी त्याच मन त्या व्यक्तीच्या मनाभोवती सतत घिरट्या घेतं राहतं. 
 मग अश्या काही ओळी आपुसकच ओठी  येतात........     
                  
                   तुझाच चेहरा 
                   तुझाच भास 
                   का रे हि सारखी आस?
                   तुझेच शब्द
                   तुझाच आवाज
                   का रे सारखी तुझी ही साद?
                   तुझेच प्रश्न
                   तुझेच उत्तर
                    का रे प्रश्नौत्तराचा हा तास?
                    सांग....?   - संकेत                                                                                                                                                           ~ ~ ~ ~ ~    
                   तुझ्या सारखी तूच सखे 
                   तुझ्यविना ना कुणी दिसे
                   तुझ्यावाचून काही सुचे
                   तूच असे रे ध्यानी - मनी 
                   तूच रे सखी साजनी... 
                  -  संकेत             
                                                   ~ ~ ~ ~ ~                                                 
                    मी आधीच वेडा होतो                                                                                                                तिने आणिक वेडे केले                                                                                                            प्रेमाच्या सुखद सरितं                                                                                                              माझे 'मी' पण सारे गेले 
                   - संकेत 
                                                 
                                                                                              



तिचा Whatsaap वरील डीपी
मी रोज वेडावून पाहतो 
अन नजरेतल्या 'स्वराला'
तिच्या, हृदय संगीत माझं देतो 
- संकेत
                                                   ~ ~ ~ ~ ~                                                 
झालेला संवाद पुन्हा वाचताना 
मन पुन्हा त्या आठवणीत रमतं 
हळूच गहिऱ्या हास्यखळी सोबत 
ते पुन्हा त्या क्षणात मिसळतं 
- संकेत 
                                    ~ ~ ~ ~ ~
मी आत्मभान विसरे 
तुला पाहताना , 
तू बोले मनातले 
मला जाणताना

                                                













बुधवार, १५ जानेवारी, २०२०

Let's Enjoy

जगताना कधी कधी नित्य नेहमीतलं काहीतरी हरवल्यासारखं जाणवत राहतं.
मनाची स्थिर घडी कुठेतरी अस्थिर झाल्यासारखी होत राहते.
कळत असतं नेमकं काय खुपतय, काय असह्य होतंय..आपल्याला,
पण उघडपणे बोलता येत नाही. आणि टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही.
कारण प्रश्न नात्याचा असतो.
नात्यातल्या त्या हळव्या हसऱ्या आणि आनंदी मनाचा असतो.
बांधलेल्या कित्येक स्वप्नांचा असतो. अगणित पुढच्या क्षणांचा असतो.
त्यामुळे नात्याला कुठेही तडा जाऊ नये , ते दुखावलं जाऊ नये.
ह्याची मन काळजी घेत राहतं. तसं प्रयत्न करतं ..
स्वतःलाच बजावत ...
' संयम ठेव रे बाबा, उगाच अस्थिर होऊ नकोस.
प्रश्नाच्या जाळ्यात अजिबात फसू नकोस ?
हे अविचारांचं जाळं आधी क्षणात मिटवून टाक.
निश्चिंत राहा. मन आभाळी ठेव.
येणारी योग्य वेळच तुला सारं काही मिळवून देईल.
Let's Enjoy this Moment...
क्षणांचा महोत्सव करता आला पाहिजे.
कळतंय ना ?
- संकेत पाटेकर
१३.०१.२०२०





Hanging Pendant Ceiling Lamp
Kharedibazar

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

कुणी तरी हवं असतं...


कुणी तरी हवं असतं...! मला नाही मांडता येत रे , तुझ्या सारखं असं काही, पण सांगू... कुणी तरी हवं असतं आपल्याला , आपल्या जवळ बसून ,आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी... आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी.. आपल्या मनाला जाणंणारं, हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी , हवं त्या वेळी, कुठूनही , कसंही हळूच येऊन ,आपल्याला थोपवणारं, घट्ट मिठीत घेणारं,आपल्यात मिसळणारं,हसवणारं , छेडणारं, वेडं म्हणणारं आणि म्हणवंणार कुणी... कुणी तरी हवं असतं....रे . कधी रागावणारं, कधी लाड पुरवणारं, प्रसंगी समजून घेणारं, समजून देणारं, आपली काळजी वाहणारं , काळजी घेणारं, आणि भरभरून प्रेम करणारं कुणी.. कुणी तरी हवं असतं ..... । आपल्या मनाची हि बाजू घेणारं.., मनातून मनाशी नातं जोडणारं, आपलं वर्तमान आणि भविष्य घडवणारं...आपलं स्वप्नं होणारं, आपल्यात विसावणारं, कुणी तरी.. कुणी तरी हवं असतं रे..... एकटेपणात साथ देणारं, आणि एकांतात हि आपल्या मनाला सुगंधित करणारं.. कुणी तरी हवं असतं...बस्स..! ~ संकेत पाटेकर